Home Breaking News जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा-खंडाळा परिसरात संत निरंकारी मिशनकडून भव्य वृक्षारोपण व स्वच्छता...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा-खंडाळा परिसरात संत निरंकारी मिशनकडून भव्य वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम संपन्न

43
0
प्रतिनिधी : श्रावणी कामत, लोणावळा :- प्रकृती म्हणजेच परमात्म्याचा अमूल्य आशीर्वाद — याच भावनेने प्रेरित होत 5 जून ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त, संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखेने ‘संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन’ च्या माध्यमातून लोणावळा व खंडाळा परिसरात भव्य वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचे आयोजन केले.
या वर्षीचा पर्यावरण दिनाचा विषय ‘Beat Plastic Pollution’ असून, त्याला अनुसरून देशभरातील 18 पर्यटनस्थळांवर हा उपक्रम एकाच वेळी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राबविण्यात आला. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा लोकोपयोगी उपक्रम साकार झाला.
 लोणावळा-खंडाळा परिसरात वृक्षारोपण व स्वच्छतेचा संदेश
लोणावळा नगरपरिषदेच्या सहकार्याने लोणावळा आणि खंडाळा परिसरात प्राकृतिक सौंदर्य असलेल्या विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्तीच्या मोहिमा राबवण्यात आल्या.
महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये:
मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजू
खंडाळा ते अमृतांजन पॉईंट
वलवन तळे, कावेरी फार्म
लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट
आयएनएस ते भुशी
तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन
नगरपरिषद कार्यालय
मावळा पुतळा इत्यादीचा समावेश होता.
या मोहिमेत नगरपरिषदेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक देविदास कडू, बाळासाहेब जाधव, मिशनचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक व हजारो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पर्यावरणप्रेमी चळवळीला ऊर्जा
या उपक्रमात मिशनच्या युवा स्वयंसेवकांनी पथनाट्य, संदेश फलक, बॅनर्स, सांस्कृतिक कार्यक्रम व जनजागृतीपर प्रस्तुती दिल्या. प्लास्टिकमुक्तीचा संदेश देत मानवी साखळीच्या माध्यमातून समाजाला पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
हे अभियान केवळ पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम नसून, सेवाभाव, सजगता आणि समाजप्रबोधनाचे शक्तिशाली माध्यम ठरले. आजची तरुण पिढी पर्यावरणासंदर्भातील प्रश्नांविषयी जागरूक होऊन कृतीशील झाली पाहिजे, असा संदेश या अभियानातून दिला गेला.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुखीजा यांची माहिती
“देशातील महाबळेश्वर, पन्हाळा, पांचगणी, लोनावळा, खंडाळा यांसारख्या 18 प्रमुख पर्वतीय पर्यटनस्थळांवर एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी झाली असून, पर्यावरण जपणं ही आपली आध्यात्मिक जबाबदारी आहे, याचा जागर निर्माण करण्यात आमचा उद्देश आहे,” असे श्री. सुखीजा यांनी सांगितले.
 निसर्गाची सेवा म्हणजे मानवतेची सेवा
पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण व प्लास्टिक प्रदूषणाविरुद्धचा लढा हा फक्त एक दिवसाचा नसून, सतत चालणारी एक नैतिक जबाबदारी आहे. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून या जबाबदारीची जाणीव संपूर्ण समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.