Home Breaking News पिंपरी-चिंचवड होणार अधिक हिरवेगार! दुर्गादेवी टेकडीवरून ५ लाख वृक्ष लागवडीच्या महाअभियानाचा शुभारंभ

पिंपरी-चिंचवड होणार अधिक हिरवेगार! दुर्गादेवी टेकडीवरून ५ लाख वृक्ष लागवडीच्या महाअभियानाचा शुभारंभ

61
0
पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शहराचे नैसर्गिक वैभव आणि ‘ग्रीन लंग्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गादेवी टेकडीसह विविध भागांमध्ये तब्बल ५ लाख झाडे लावून ती जगविण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प महापालिकेने केला आहे. या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने मोठी झेप घेणार असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गादेवी टेकडी येथे ‘हरित पिंपरी-चिंचवड शहर’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते १,००० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय जगताप लिखित ‘दुर्गा टेकडीचा ५० वर्षांचा इतिहास’ या माहितीपूर्ण पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विविध समिती सभापती, नगरसेवक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, भारतीय लष्कराचे अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह ते दुर्गादेवी टेकडी या १० किलोमीटर अंतराची सायकल फेरी काढण्यात आली. या सायकल रॅलीत महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह शेकडो सायकलप्रेमींनी सहभाग घेत पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश दिला. या उपक्रमामुळे युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, “पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शहरात ५ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला असला तरी ती जगविणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला तर पिंपरी-चिंचवड देशातील सर्वाधिक हरित शहरांपैकी एक ठरू शकते.”
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “फक्त झाडे लावून उपयोग नाही, तर त्यांची निगा राखणे आणि ती मोठी होईपर्यंत जतन करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शहर स्वच्छ ठेवणे, कचरा न करणे आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
आमदार अमित गोरखे यांनी प्रत्येकाने किमान एक झाड पूर्णपणे जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तर आमदार उमा खापरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे नमूद करत प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवडीचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुर्गादेवी टेकडीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “दुर्गा टेकडी हे केवळ उद्यान नसून पिंपरी-चिंचवड शहराचे नैसर्गिक रत्न आहे. ही टेकडी नागरिकांना निसर्गाशी जोडते, मानसिक समाधान देते आणि शहरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. दुर्गा टेकडीला राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख पर्यटन आणि पर्यावरणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. याशिवाय शहरातील वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.”
यावेळी दुर्गादेवी टेकडीच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या पहिल्या पिढीतील शिल्पकारांचेही स्मरण करण्यात आले. ओसाड आणि खडकाळ टेकडीचे रूपांतर हिरव्यागार वनराईत करणारे महानगरपालिकेचे पहिले प्रशासक हरनामसिंग, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंढे आणि तत्कालीन मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज दुर्गादेवी टेकडी शहरासाठी ऑक्सिजन हब बनली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेत पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केला. “जास्तीत जास्त झाडे लावून वसुंधरा स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू,” अशी सामूहिक प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली.
५ लाख वृक्ष लागवडीच्या या महाअभियानामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय विकासाला नवी दिशा मिळणार असून भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.