पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शंकर जगताप व आयुक्त शेखर सिंह यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक; नागरी प्रश्नांवर त्वरित उपाययोजनांचा निर्धार
पिंपरी, ५ जून २०२५ : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या नागरी समस्या, वाहतुकीची अडचण, पायाभूत सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या विविध तक्रारींचा आढावा घेण्यासाठी आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. ही बैठक केवळ प्रशासकीय नव्हे, तर विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त केले जात आहे.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्मार्ट सिटीच्या प्रतिनिधींसह आरोग्य, पर्यावरण, नगररचना, जलपुरवठा, बांधकाम आणि वाहतूक विभागांचे प्रमुख उपस्थित होते. नागरिकांच्या विविध मागण्यांवर, प्रलंबित प्रकल्पांवर आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
प्रमुख मुद्दे व निर्णय:
🔹 मोरया गोसावी मंदिर परिसरात रस्त्याचे डागडुजी आणि पार्किंग व्यवस्थेचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात आला. हे धार्मिक स्थळ असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असते.
🔹 NHAI च्या पत्रव्यवहारानुसार ताथवडे-पुनावळे-वाकड परिसरातील सर्व्हिस रोडजवळील नाल्यांची स्वच्छता व निचऱ्याची उपाययोजना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत तातडीने करण्यात येणार आहे.
🔹 रिलायन्स कंपनीने उघड्यावर टाकलेल्या केबल्समुळे महापालिकेच्या मालमत्तेचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान – यासंदर्भात कंपनीकडून हानीभरपाई व दुरुस्तीची मागणी करत चौकशी सुरू करण्याचे निर्देश.
🔹 शिक्षकांच्या मागण्या, पुनावळे येथे ऑक्सिजन पार्क, काळेवाडी एम एम चौक येथे ग्रेड सेपरेटर, ‘लेफ्ट फ्री’ मार्गांची अंमलबजावणी, तसेच प्रारूप विकास आराखड्याचे मराठीत भाषांतर या अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
🔹 काळेवाडीत शिवसृष्टी ट्रॅफिक आयलंड, भूमकर चौक, कल्पतरू पिंपळे गुरव, पी.के चौक, वाकड पोलीस चौकी येथील अतिक्रमण काढून मेट्रो मार्गासाठी रस्ते रुंदीकरणाचे काम, आणि पुनर्विकसित गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांसाठी जागांचे आरक्षण यावरही त्वरित कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
🔹 वाल्हेकरवाडी स्मशानभूमी संदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या परिसरात आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे.
आमदार शंकर जगताप यांचा स्पष्ट संदेश: “शहरातील नागरी समस्या हा केवळ कागदावरचा विषय राहू नये, तर त्यावर वेळेत कृती होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन अधिकारी तातडीने कामाला लागतील अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या नियमित बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला जाईल.”
एकात्मिक शहर विकासासाठी प्रशासन सज्ज:
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनीही या बैठकीत प्रलंबित योजनांचा कार्यान्वयनाचा रोडमॅप सादर केला. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची स्वच्छता, अंडरपास निचरा व्यवस्था आणि वाहतुकीची सुधारणा यावर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.