प्रतिनिधी – श्रावणी कामत | वडगाव मावळ | ३० मे :- मावळ तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांना चालना देण्यासाठी आणि नागरी समस्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात पार पडली. ही बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या विशेष पुढाकाराने घेण्यात आली. या बैठकीला विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मावळ तालुक्यातील भांगरवाडी येथील पूल प्रकल्प, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या, भाजी मंडईचे काम, घरकुल योजना, मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, अभ्यासिकेचे प्रकल्प या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर व सखोल चर्चा करण्यात आली.
अनेक योजनांमध्ये निधीअभावी आणि तांत्रिक कारणांमुळे अडथळे येत असल्याने प्रशासनाने अशा अडथळ्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, कामांची प्रगती निश्चित वेळेत पूर्ण झाली पाहिजे आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता झाली पाहिजे.
या बैठकीस प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक संचालक अभिजीत केतकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, भूसंपादन अधिकारी विजय फुलपगारे, तसेच तळेगाव, वडगाव, देहू व लोणावळा येथील मुख्याधिकारी व विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी सांगितले की, “मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच माझा प्रमुख अजेंडा असून नागरिकांच्या अडचणी, मागण्या आणि अपेक्षांबाबत मी सातत्याने प्रशासनासोबत समन्वय ठेवतो आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास गेले तर मावळचा चेहरा-मोहरा बदलून जाईल.”
या बैठकीनंतर एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून लवकरच विविध विकासकामांना गती मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही बैठक केवळ औपचारिक न राहता कृतीक्षम निर्णयांची सुरुवात ठरली आहे.