नवी दिल्ली :- भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळायची असून, बीसीसीआयने गुरुवारी (१३ मे २०२५) या दौऱ्यासाठी महिला संघाची अधिकृत घोषणा केली आहे. २८ जून ते २२ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय महिला संघ ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये हरमनप्रीत कौर कर्णधार, तर स्मृती मानधना उपकर्णधार असणार आहे.
स्नेह राणा आणि शेफाली वर्माचे पुनरागमन – संघात नवा जोश
या संघात अनेक मोठ्या नावांचा समावेश झाला असून, काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यावेळी सर्वात मोठा धक्का म्हणजे रेणुका सिंग ठाकूर आणि श्रेयंका पाटील या दोन प्रमुख गोलंदाजांचा संघातून वगळला जाणे. दुसरीकडे, WPL (महिला प्रीमियर लीग) मधील दमदार कामगिरीमुळे शेफाली वर्मा आणि स्नेह राणा यांना संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. स्नेह राणा तब्बल २७ महिन्यांनंतर टी-२० संघात परतली असून तिची अलीकडील त्रिकोणी मालिकेतील कामगिरी कौतुकास्पद होती. शेफाली वर्मा देखील ऑक्टोबर २०२४ पासून सर्व प्रकारात बाहेर होती. मात्र, तिने WPL मध्ये स्फोटक फलंदाजी करून पुन्हा एकदा निवड समितीचे लक्ष वेधले.
नवे चेहरे, नवे संधी
या दौऱ्यात अलीकडे आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या सायली सातघरेचा दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे. तर, त्रिकोणी मालिकेतील काशवी गौतम हिला वगळण्यात आले असून तिच्या जागी क्रांती गौड़ हिला संधी देण्यात आली आहे. यामुळे संघात नव्या दमाच्या खेळाडूंना आत्मविश्वासाने खेळण्याची संधी मिळणार आहे.
भारताची यशस्वी पार्श्वभूमी – आता इंग्लंडवर नजर
भारतीय महिला संघाने अलीकडेच श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात श्रीलंकेला ९७ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. या सामन्यात स्मृती मानधनाने शानदार शतक,तर अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांनी निर्णायक गोलंदाजी करत विजय मिळवून दिला. या विजयानंतर संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून इंग्लंड दौऱ्यातही अशीच प्रभावी कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.
विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मालिका
या इंग्लंड दौऱ्याचे महत्त्व अधिक वाढते कारण २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक भारतात २९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे हा दौरा भारतीय संघाच्या अंतिम तयारीसाठी निर्णायक ठरणार आहे. ८ संघांचा सहभाग असलेल्या या विश्वचषकात भारताला सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्धची ही मालिका अत्यंत उपयुक्त ठरेल.
दरम्यान, भारतीय पुरुष संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड लवकरच करण्यात येणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीनंतर, संघाच्या कर्णधारपदासाठी अनेक चर्चांना उधाण आले असून, शुभमन गिलचं नाव आघाडीवर असल्याचं वृत्त आहे.