Home Breaking News पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र हादरला; पुण्यासह राज्यातील ६ पर्यटकांचा मृत्यू, संतोष जगदाळे...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र हादरला; पुण्यासह राज्यातील ६ पर्यटकांचा मृत्यू, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं निधन

130
0

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहशतवाद्यांनी शांततेच्या शोधात आलेल्या निरपराध पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत भ्याडपणा दाखवला. या भीषण हल्ल्यात आतापर्यंत तब्बल ३० पर्यटकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ६ जण महाराष्ट्रातील आहेत. मृतांमध्ये पुणे, डोंबिवली आणि नवी मुंबईतील नागरिकांचा समावेश आहे.

पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल होते. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधून सांत्वन केलं होतं. त्यांच्या पार्थिवासह कौस्तुभ गणबोटे यांचेही पार्थिव आज पुण्यात आणले जाणार आहे. पुणे शहर शोकमग्न झाले आहे.

 डोंबिवलीतील त्रिकुट गमावलं…
या हल्ल्यात डोंबिवलीच्या नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली येथील रहिवासी हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे तिघेही एकत्र फिरायला गेले होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. ते आपल्या पत्नी व मुलीसह पहलगामला गेले होते. संजय लेले यांचा मुलगा हर्षल हा देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्या हाताला गोळी लागली आहे.

राज्य शासनाची तत्परता…
दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावर जातीने लक्ष केंद्रित केले आहे.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, सरकारकडून हल्ल्यातील सर्व कुटुंबीयांना आर्थिक, वैद्यकीय व कायदेशीर मदत तत्परतेने देण्यात येणार आहे. ज्या पर्यटकांचे नातेवाईक जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात असतील, त्यांनी तात्काळ प्रशासनाने दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.