Home Breaking News “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे” – अजित पवार यांचा...

“महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे” – अजित पवार यांचा सणसणीत इशारा!

78
0

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मराठी भाषेच्या अस्मितेचा जोरदार पुरस्कार केला. “महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी भाषा आलीच पाहिजे,” असं ठाम मत त्यांनी मांडलं. मराठी ही आपल्या ओळखीचा आत्मा आहे, असंही ते म्हणाले.

मराठीला अभिजात दर्जा – नरेंद्र मोदींनी दाखवले धाडस

अजित पवार म्हणाले, “मराठी ही आपली मातृभाषा असून तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दाखवलं. त्यामुळे हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.”

मराठी, हिंदी आणि इंग्रजी – तिन्ही भाषा महत्त्वाच्या

त्यांनी स्पष्ट केलं की, “हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी मातृभाषा आणि इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. या तिन्ही भाषांचा समतोल राखणे गरजेचे आहे.” मराठी भाषा न शिकवण्यावरुन विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “ज्यांच्याकडे काही उद्योग नाही, ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत,” अशी जहाल टीका त्यांनी केली.

नाशिक दंगलप्रकरणात कारवाई सुरु – कुणालाही दिलासा नाही

नाशिकच्या दंगल प्रकरणावर अजित पवार म्हणाले, “कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. पोलीस आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत.”

पीएसआय कासले प्रकरणाची चौकशी होणार – महिलेला मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई

बीडमधील निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) अभिजीत कासले यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, आणि सत्य समोर आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.”

तसेच, बीडमध्ये महिलेला अमानुषपणे मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अजित पवार म्हणाले, “त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सजग आहे. संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणारच.”

मराठी अस्मिता आणि कायद्याचा सन्मान राखणार – अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मराठी भाषेच्या महत्त्वापासून ते कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत विविध मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. “महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी येणं आवश्यक आहे,” हा त्यांचा संदेश स्पष्टपणे समाजासमोर गेला आहे.