मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील प्रतिष्ठित शेर-ए-पंजाब गुरुद्वाराचे चेअरमन राजबन सिंग, गुरुजन सिंग सलोजा, संसार सिंग सैनी, नेल्सन परेरा आणि ओकार सिंग यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. या प्रवेशामुळे जोगेश्वरीतील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे मानले जात आहे.
पंजाबी व शीख समाजाचा शिवसेनेला मोठा पाठिंबा
शेर-ए-पंजाब गुरुद्वाराशी संबंधित हे सर्व मान्यवर स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व मानले जातात. त्यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे पंजाबी व शीख समाजाचा मोठ्या प्रमाणावर शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाला पाठिंबा असल्याचा संकेत मानला जात आहे.
“ठाकरे साहेबांचे नेतृत्वच आमची प्रेरणा!”
या प्रवेशावेळी बोलताना राजबन सिंग यांनी सांगितले की, “शिवसेना हा फक्त पक्ष नसून, एक विचारधारा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांचे नेतृत्व आम्हाला प्रेरणा देते!”
नेत्यांची उपस्थिती आणि भविष्यातील राजकीय रणनीती
या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील प्रभू, आमदार अनंत (बाळा) नर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जोगेश्वरी आणि संपूर्ण मुंबईतील पक्षबांधणी, आगामी निवडणुका, तसेच पक्षाची मजबूत घडी कशी बसवायची यावर सखोल चर्चा करण्यात आली.
मुंबईत बदलत्या राजकीय समीकरणांवर परिणाम?
मुंबईतील राजकारणात शीख आणि पंजाबी समाजाचा मोठा वाटा आहे. अशा प्रतिष्ठित नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश म्हणजे, आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची ताकद अधिक बळकट होत आहे, असे मानले जात आहे.
शिवसेनेत नव्या नेतृत्त्वाला संधी!
या प्रवेशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शिवसेनेत तरुण आणि अनुभवी नेतृत्वाचा संमिश्र प्रभाव वाढताना दिसत आहे.