देहू येथे पार पडलेल्या जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानला जातो.
या विशेष सोहळ्यात खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजननाथ आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “संत तुकाराम महाराजांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शन करणारे आहेत. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषातून समाजसेवेची प्रेरणा मिळते. त्यांच्या अभंगातून रंजल्या-गांजल्यांची सेवा करण्याचे बळ मिळते.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव वाढला आहे. मात्र, संत तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच जटिल तत्त्वज्ञान साध्या-सोप्या मराठीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.
सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध
शिंदे यांनी यावेळी शासनाच्या विविध निर्णयांचा उल्लेख करत सांगितले की, “वारकऱ्यांच्या सोयीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या भेदभावमुक्त समाजाच्या संदेशानुसार शासन लोककल्याणासाठी कार्य करत असून सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सुख-समाधान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
वारकरी संप्रदायाच्या हितासाठी शासनाने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले असून देहू येथे आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी शासन संपूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.