पुणे – पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी संमतीच्या संबंधातील व्यवहाराचे पैसे दिले नाहीत, म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
घटना कशी घडली?
स्वारगेट बस स्थानकात एका सराईत गुन्हेगाराने पीडित तरुणीला ‘ताई, कुठे जायचे आहे?’ असे विचारून भावनिक साद घातली. त्यानंतर तिची दिशाभूल करत तिला शिवशाही बसमध्ये नेऊन अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली होती.
प्राथमिक तपासात पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. सुरुवातीला भीतीमुळे तरुणीने कोणालाही काही सांगितले नाही, मात्र काही वेळानंतर तिने तिच्या मित्राला ही घटना सांगितली. मित्राने तिला पोलिसांकडे जाण्यास प्रवृत्त केले आणि नंतर संपूर्ण प्रकार उघड झाला.
नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “संमतीच्या संबंधातील व्यवहाराचे पैसे दिले गेले नाहीत, म्हणून हा प्रकार घडला आहे.” त्यांच्या या विधानामुळे नवीन चर्चेला उधाण आले असून, अनेकांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचेही धक्कादायक विधान
यापूर्वी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “हा फोर्सफुल प्रकार नाही” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे अनेक सामाजिक संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
डीसीपी गिल यांची कारवाई आणि रुपाली पाटील यांचे वक्तव्य
या प्रकरणाचा तपास करताना डीसीपी गिल साहेब यांनी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची विचारपूस केली. त्यांनी “मॅडम, तुम्ही आंदोलन करणार असाल, आरोपीला काळे फासणार असाल तर कृपया तसे करू नका,” असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
त्यावर रुपाली पाटील यांनी उत्तर देताना म्हटले की, “मी कोणतेही आंदोलन करणार नाही आणि कोणतेही विधान करणार नाही, जोपर्यंत या घटनेची खरी माहिती मिळत नाही. मला न्यायालयात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे आणि संपूर्ण केसचा अभ्यास करणे गरजेचे आहे.”
पोलिस तपासाचा वेग वाढणार?
या प्रकरणात विविध दावे समोर येत असताना, पोलिसांनी आपला तपास अधिक गतिमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. रुपाली पाटील यांचे दावे आणि गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य यामुळे तपासाची दिशा बदलू शकते का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.