Home Breaking News एआय इम्पॅक्ट समिट २०२६ : भारत मंडपम् येथे महाराष्ट्राची डिजिटल झेप; मुख्यमंत्री...

एआय इम्पॅक्ट समिट २०२६ : भारत मंडपम् येथे महाराष्ट्राची डिजिटल झेप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

82
0
नवी दिल्ली : Bharat Mandapam येथे पार पडलेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘महा एआय: बिल्डिंग सेफ, सिक्युअर अँड स्मार्ट गव्हर्नन्स’ या विशेष सत्राला मोठा प्रतिसाद लाभला. या महत्त्वपूर्ण सत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis उपस्थित होते. तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री Ashish Shelar यांनी सत्रात सहभाग घेत राज्याच्या एआय धोरणाची सविस्तर मांडणी केली. व्यासपीठावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाचा आढावा घेत, “एआय ही केवळ तांत्रिक प्रगती नसून प्रशासनात पारदर्शकता, वेग आणि विश्वास निर्माण करणारे साधन आहे,” असे नमूद केले. त्यांनी राज्याने स्वीकारलेल्या डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेचे आणि डिजिटल गव्हर्नन्सच्या व्यापक दृष्टीकोनाचे कौतुक केले.
मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, एआय ही लोकशाही अधिक सशक्त करण्याची मोठी संधी आहे. सुरक्षित आणि स्मार्ट शासनाच्या उद्दिष्टासाठी महाराष्ट्राने प्रशासनात एआयचा प्रभावी वापर सुरू केला असून राज्य तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासन अधिक मानवी, अचूक आणि प्रतिसादक्षम बनविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Microsoft च्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या ‘महा क्राईम’ प्रकल्पाचा विशेष उल्लेख करत मंत्री शेलार म्हणाले की, या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण, तपास प्रक्रियेची गती आणि पारदर्शकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि एआय-आधारित मॉडेल्सच्या साहाय्याने पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होत आहे.
राज्यात ‘महा आयटी’ अंतर्गत उभारण्यात येणारे ‘इंटेलिजेंट गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर’ हे क्लाउड-नेटिव्ह आणि एपीआय-आधारित मॉडेल असून विविध शासकीय विभागांना एकत्रित करणारे डिजिटल फ्रेमवर्क विकसित केले जात आहे. या माध्यमातून नागरिकांना एकाच प्लॅटफॉर्मवर अधिक वेगवान व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
दिशाभूल करणारी माहिती, डीपफेक आणि सायबर हल्ल्यांविरोधात मजबूत सायबर सुरक्षा प्रणाली उभारण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. हायब्रिड पडताळणी यंत्रणा, डेटा संरक्षण धोरणे आणि सायबर सेलच्या क्षमतेत वाढ यावर विशेष भर दिला जात आहे.
सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महाराष्ट्र सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, डॉ. अनुपम चटोपाध्याय, रणजित गोस्वामी, सुरेश सेठी, डॉ. अमित कपूर, बिना सरकार आणि देवरुप धर यांनी एआय तंत्रज्ञानाच्या वापरातील अनुभव, नवकल्पना आणि भविष्यातील आव्हानांवर सखोल चर्चा केली. या परिषदेत महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्स मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून, एआयच्या माध्यमातून सुशासन अधिक परिणामकारक करण्याच्या राज्याच्या प्रयत्नांचे व्यापक स्वागत झाले.