Home Breaking News राजगडावर भीषण दुर्घटना! २१ वर्षीय पुण्यातील युवतीचा ४०० फूट दरीत कोसळून मृत्यू...

राजगडावर भीषण दुर्घटना! २१ वर्षीय पुण्यातील युवतीचा ४०० फूट दरीत कोसळून मृत्यू पावसाळी मोसमात ट्रेकर्ससाठी धोक्याचा इशारा; प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

13
0
राजगड | प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर एका हृदयद्रावक अपघातात २१ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला आहे. कोमल शिंदे (वय २१, रा. आळंदी, पुणे) असे या मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. ती पतीसोबत ट्रेकसाठी राजगडावर आली होती. मात्र, ५ जून रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास, किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून ४०० फूट दरीत कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनास्थळी काय घडलं?
पावसामुळे ओले व चिकट झालेले वाट मार्ग अत्यंत निसरडे झाले होते. कोमल शिंदे ट्रेक करत असताना पाय घसरला, आणि ती थेट संजीवनी व सुवेळा माचीच्या पायथ्याजवळ खोल दरीत कोसळली. या घटनेत तिला डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आणि तिने जागीच प्राण सोडले. घटनेनंतर स्थानिक स्वयंसेवक आणि ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शोधून राजसदर भागात हलवण्यात आला. यानंतर वेल्हे पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
प्रशासनाने पूर्वीच दिला होता इशारा
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा वन विभागाने नुकतेच ट्रेकर्ससाठी पावसाळ्यातील काळजी घेण्याचे आवाहन केले होते. पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ट्रेक दरम्यान पर्यावरणाची काळजी घेणे आणि सुरक्षितता जपणे, यावर भर दिला होता.
मागील वर्षीही घडली होती दुर्दैवी घटना
पावसाळ्याच्या काळात ट्रेकिंगसाठी आकर्षण असलेल्या पुणे जिल्ह्यात याआधीही अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी लोणावळ्यातील भुशी डॅम जवळ पाच सदस्यीय कुटुंबाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील मावळ, खेड, मुलशी, भोर, जुन्नर, अंबेगाव आणि वेल्हे तालुक्यांत पर्यटक आणि ट्रेकर्सनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
पुण्यातील प्रमुख ट्रेकिंग आणि पर्यटन स्थळे:
मावळ: भुशी डॅम, बेन्देवाडी, दहुली धबधबा
खंडाळा: टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट, राजमाची पॉईंट
पवना डॅम: सहारा ब्रिज, टाटा डॅम, घुबड तलाव
मुलशी: ताम्हिणी घाट, मिल्कीबार धबधबा
हवेली: खडकवासला, वरसगाव डॅम
अंबेगाव: भीमाशंकर, डिंभी डॅम, कोंढवळ धबधबा
जुन्नर: माळशेज घाट, शिवनेरी किल्ला, माणिकडोह
भोर व वेल्हे: भाटघर डॅम, विविध धबधबे
खेड व इंदापूर: घाट भाग आणि पाणथळ प्रदेश
काय शिकावं या घटनेतून?
राजगड किल्ल्यावर आजवर अनेक ट्रेकर्सनी यशस्वी चढाई केली आहे. मात्र, सुरक्षितता व काळजी घेणे ही सर्वात मोठी प्राथमिकता असावी, अन्यथा साहसाचा उत्साह दुर्दैवात रूपांतरित होऊ शकतो. यामुळे ट्रेकिंग करणाऱ्यांनी योग्य उपकरणं, गाईडची साथ आणि हवामानानुसार नियोजन करूनच ट्रेकसाठी बाहेर पडावे.