पिंपरी-चिंचवड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. राज्यभरात अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असतानाच, याच निकालामुळे एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे.
उमंग रमेश लोंढे (वय – १६) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. उमंगने चिंचवडमधील माटे विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली होती. निकालात त्याला ७५ टक्के गुण मिळाले होते. हा टक्केवारी अत्यंत चांगली मानली जाते, मात्र त्याच्या इतर मित्रांना ८० ते ९० टक्के गुण मिळाल्याने तो मनातून खचला होता.
गुणांच्या तुलनेने आत्ममूल्यांकन… आणि निर्णयात गमावलेलं आयुष्य! मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांशी गुणांची तुलना करताना उमंगला आपले यश अपुरे वाटू लागले. समाजातील स्पर्धात्मक मानसिकता, पालक व शिक्षकांच्या अपेक्षा आणि मित्रांशी तुलना यामुळे त्याच्यावर मानसिक दबाव वाढला होता. त्याने कोणाशीही आपल्या मनातील नैराश्य शेअर न करता, गुरुवारी (१३ मे) सकाळी घरात एकटा असताना ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
आई-वडील घराबाहेर गेले होते – आई ऑफिसला जात होती आणि वडील तिला सोडण्यासाठी गेले होते. घरी परतल्यावर वडिलांना उमंगचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने वायसीएम रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पालकांवर दुःखाचा डोंगर उमंगच्या आत्महत्येने त्याचे आई-वडील पूर्णतः कोलमडले आहेत. ‘७५ टक्के हे कमी नाही, पण समाजाने निर्माण केलेल्या चुकीच्या यशाच्या व्याख्या आणि गुणांच्या चढाओढीने माझ्या मुलाचा आत्मा हरवला,’ असं उमंगच्या वडिलांनी सांगितलं.
पोलीस तपास सुरू ही बाब समजताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागील मानसिक कारणांवर लक्ष केंद्रीत करून पुढील कारवाई केली जात आहे.
समाजासाठी आवाहन – ही घटना समाजाला आरसा दाखवणारी आहे. गुणांपेक्षा मूलांचे मानसिक स्वास्थ्य जास्त महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांनी व शिक्षकांनी मुलांवर अपयशाचे किंवा “इतरांपेक्षा कमी गुण” मिळाल्याचे ओझे लादू नये. संवाद, समजूत आणि स्वीकार यांची नितांत गरज आहे.