नवी दिल्ली | ८ मे २०२५ :- भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील विविध १५ सैन्य ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी (Integrated Counter-UAS Grid) हे सर्व हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ व ८ मेच्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणांवर लक्ष्य ठेवले होते.
पाकिस्तानकडून केलेले हल्ले – भारताने यशस्वीपणे परतवले
पाकिस्तानने हल्ल्यासाठी ड्रोन आणि शॉर्ट रेंज मिसाईल्सचा वापर केला होता. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी एकाही क्षेपणास्त्राला लक्ष्यावर पोहोचू दिले नाही.
पाकिस्तानी मिसाईल्सचे अवशेष पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये सापडले असून, हे हल्ले किती असफल ठरले, याचे पुरावे म्हणून वापरले जात आहेत.
भारताचा पलटवार – पाकिस्तानचे HQ-9 यंत्रणा उद्ध्वस्त
भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या हल्ल्याला तत्काळ आणि तीव्र प्रत्युत्तर दिले. लाहोर परिसरात पाकिस्तानची HQ-9 चीनी बनावटीची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे निष्प्रभ करण्यात आली.
विश्वसनीय सूत्रांनुसार, भारताने दोन रात्री सलग ड्रोनद्वारे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण व्यवस्थांमध्ये मोठी सेंध घातली असून, यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आहेत.
पाकिस्तानने लक्ष्य केलेली १५ ठिकाणे:
| क्र. | सैन्य तळ | राज्य/केंद्रशासित प्रदेश |
|---|---|---|
| 1 | अवंतीपुरा | जम्मू आणि काश्मीर |
| 2 | श्रीनगर | जम्मू आणि काश्मीर |
| 3 | जम्मू | जम्मू आणि काश्मीर |
| 4 | पठाणकोट | पंजाब |
| 5 | अमृतसर | पंजाब |
| 6 | कपूरथला | पंजाब |
| 7 | जालंधर | पंजाब |
| 8 | लुधियाना | पंजाब |
| 9 | आदमपुर | पंजाब |
| 10 | भटिंडा | पंजाब |
| 11 | चंदीगड | केंद्रशासित प्रदेश |
| 12 | नल | राजस्थान |
| 13 | फलोदी | राजस्थान |
| 14 | उत्तरलाई | राजस्थान |
| 15 | भुज | गुजरात |


