सचिन साठे यांनी दिला इशारा – प्रशासनाने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन!
प्रतिनिधी श्रावणी कामत
पिंपरी, पुणे (दि. ७ एप्रिल २०२५) – पिंपळे निलख, विशाल नगर आणि वाकड परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरीही त्याचा दाब अत्यंत कमी असल्याने सोसायट्यांमध्ये, व्यापारी आस्थापनांमध्ये आणि छोट्या दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पाणीटंचाईमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
विशाल नगर, पिंपळे निलख आणि वाकड परिसरात अंदाजे ४० हजार लोकसंख्या असून, हजारो दुकाने आणि व्यापारी संकुले आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून येत आहे. पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, त्यामुळे हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. याचा आर्थिक फटका मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
महापालिकेच्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार!
नागरिक वेळेवर पाणीपट्टी आणि मिळकत कर भरत असतानाही प्रशासन मात्र त्यांच्या समस्या ऐकून घेण्यास टाळाटाळ करत आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या धोरणामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांना त्रास होत आहे, मात्र विशाल नगर आणि पिंपळे निलख परिसरात ही समस्या अधिक गंभीर झाल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी महिलांचा हंडा मोर्चा – सचिन साठेंचा इशारा
या अन्यायकारक परिस्थितीविरोधात आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते सचिन साठे यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. “जर पुढील चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर शुक्रवार (दि. ११) रोजी शेकडो महिला भगिनी हंडा मोर्चा काढून ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयावर धडक देतील आणि अधिकाऱ्यांना घेराव घालतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
आरोग्य धोक्यात – दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता
टँकरने पुरवले जाणारे पाणी किती सुरक्षित आहे, याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे. अनेक ठिकाणी हे पाणी दूषित आढळून आले आहे, त्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग आणि साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलावीत – नागरिकांची मागणी
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
-
परिसरातील जलसाठे तपासून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा.
-
जलवाहिन्यांची साफसफाई करून पाण्याचा दाब योग्य ठेवावा.
-
दिवसाआड ऐवजी दररोज नियमित आणि वेळेवर पाणीपुरवठा व्हावा.
-
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष पथके नेमावीत.