Home Breaking News मोहन भागवत यांचे तीव्र वक्तव्य: “वाईट हेतू असलेल्यांचे डोळे उपटून टाकावेत” –...

मोहन भागवत यांचे तीव्र वक्तव्य: “वाईट हेतू असलेल्यांचे डोळे उपटून टाकावेत” – पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया

23
0

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना अत्यंत कठोर आणि स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी हा हल्ला धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष असल्याचे ठामपणे सांगितले.

भागवत म्हणाले की, “आपण आता इतके शक्तिशाली झालो आहोत की, आपल्याला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून हत्या करणे, ही केवळ क्रूरता नाही, तर मानवतेचाही अपमान आहे.” त्यांनी या कृत्याचा जोरदार निषेध करत देशवासीयांना एकजुटीचा संदेश दिला.

मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणात रामायणातील उदाहरण देताना म्हटले की, “रावण हा शिवभक्त होता, पण त्याचे वागणे अधर्माचे होते. त्यामुळेच भगवान रामांनी त्याचा नाश केला.” आजही समाजात असे लोक आहेत, ज्यांना प्रेमाने, शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला तरीही ते बदलत नाहीत. “अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा लागेल आणि त्यांना धडा शिकवावाच लागेल,” असे ते ठामपणे म्हणाले.

एकजूट आणि शक्तीचे प्रतीक असले पाहिजे हिंदुस्थान
भागवत म्हणाले, “जर आपण सारे हिंदुस्थानी एकत्र आलो, तर कोणीही वाईट नजरेने आपल्याकडे पाहण्याची हिंमत करणार नाही. आणि जर कोणी तसे केले, तर त्यांचे डोळे उपटून टाकावेत.” त्यांचा संदेश स्पष्ट होता – अहिंसा ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण दुर्बलपणा कधीच नाही.

ते पुढे म्हणाले की, “आपण शांतताप्रिय आहोत, पण अत्याचार सहन करणे आपल्याला मान्य नाही. एक सशक्त आणि सजग समाजच अशा घटनांना रोखू शकतो.” त्यांनी समाजात एकतेचा आणि सजगतेचा जागर करण्याचे आवाहन केले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. देशभरातूनही त्याच्या भाषणावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

धर्म-अधर्माचा संघर्ष : पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांची संतप्त प्रतिक्रिया! “वाईट हेतू असलेल्यांचे डोळे उपटून टाकावेत!”