Home Breaking News पुण्यात हिंदू सकल समाजाचं जोरदार आंदोलन; काश्मीरमधील निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा तीव्र निषेध

पुण्यात हिंदू सकल समाजाचं जोरदार आंदोलन; काश्मीरमधील निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा तीव्र निषेध

23
0

पुणे : काश्मीरमधील पेहेलगाम येथे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करत देशातील निष्पाप २८ पर्यटकांना निर्दयपणे गोळ्या घालून ठार मारले. या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी व शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यात हिंदू सकल समाजाच्या वतीने भव्य हिंदू रक्षा मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या मोर्चात विविध क्षेत्रातील नागरिक, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चात देशभक्तीपर घोषणांनी आकाश दणाणून गेले. हातात राष्ट्रध्वज आणि निषेधाच्या फलकांसह जमलेल्या नागरिकांनी पाकिस्तानच्या अतिरेकी कृत्याचा प्रखर निषेध व्यक्त केला.

या मोर्चाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक १६ महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अनघा ताई अनिल दिवाणजी यांनी केले. तसेच त्या प्रमुख संयोजक म्हणून ‘कसबा संस्कार केंद्र पुणे’च्या वतीने मोर्चाचे प्रभावी आयोजन करण्यात आले. त्यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गानेही देशभक्तीचा जोरदार जल्लोष करीत या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.

मोर्चा दरम्यान आयोजित श्रद्धांजली सभेत शहीद नागरिकांच्या स्मृतीप्रती आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सौ. अनघा ताई दिवाणजी यांनी आपल्या भाषणात म्हटले, “देशातील निरपराध नागरिकांवर केलेला हा हल्ला मानवतेच्या विरोधातला आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलून अशा भ्याड अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी आमची मागणी आहे.”

या कार्यक्रमात शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेसाठी एकत्र येऊन अशा अतिरेकी कृत्यांचा जाहीर निषेध करण्याची गरज असल्याचे सर्व वक्त्यांनी सांगितले.

हिंदू सकल समाजाच्या या निर्धारपूर्ण मोर्चाने पुण्यात एकजूट आणि देशभक्तीची आगळी उर्जा निर्माण केली. शहीदांच्या बलिदानाचा सन्मान राखत आणि देशद्रोही शक्तींना चोख उत्तर देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार या निमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त झाला.