मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण मेडोवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी महाराष्ट्र गृह विभागाने मुंबई पोलिसांना समुद्रसुरक्षा अधिक वाढवण्याचे आदेश दिले असून, विशेष गस्त आणि सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या दहशतवादी हल्ल्याला देशाच्या एकतेवर केलेला हल्ला मानले जात असून, केंद्र सरकार, लष्कर, आणि गुप्तचर यंत्रणांनी याचे सखोल अन्वेषण सुरू केले आहे. हा गेल्या काही वर्षातील सर्वात भीषण हल्ला मानला जातो, ज्यामध्ये अनेक निष्पाप पर्यटक आणि स्थानिक जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या मधुबनी येथे ‘राष्ट्रीय पंचायती राज दिना’च्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अत्यंत कठोर भाषेत हल्लेखोरांना इशारा दिला. ते म्हणाले, “22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे घडलं, ते मानवतेवरचा घात आहे. भारत त्याच्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला घेईल. जे दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे आहेत, त्यांना कल्पनेच्या पलिकडची शिक्षा दिली जाईल. भारत हा शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांचा पाठलाग करेल. दहशतवाद्यांचे पाश झुगारून टाकण्यासाठी 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती पुरेशी आहे.”
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, “भारताच्या भूमीवर दहशतवाद स्वीकारला जाणार नाही. जो कोणी मानवतेवर विश्वास ठेवतो, तो भारताच्या पाठीशी उभा आहे.” पंतप्रधान मोदींनी या संकटप्रसंगी भारताला पाठिंबा दिलेल्या जगातील विविध देशांचे आणि त्यांच्या नेत्यांचे आभारही मानले.
मुंबईतील पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्तात वाढ केली असून, मुंबईच्या गेटवे, समुद्र किनारे, मॉल्स, रेल्वे स्थानके, विमानतळ आणि महत्त्वाच्या इमारतींवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.