पुणे/बीड | प्रतिनिधी: निवडणूक घोटाळा, एन्काऊंटर ऑफर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खळबळ उडवणारा निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) रणजित कासले याला अखेर पुण्यातील स्वारगेटमधील हॉटेलमधून बीड पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या कासलेने गुरुवारी रात्री माध्यमांसमोर येत एकापेक्षा एक गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रणजित कासले याने पुण्यात येऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने दावा केला की, “परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान मला ईव्हीएम मशीनपासून दूर ठेवण्यासाठी धनंजय मुंडेंनी १० लाख रुपये पाठवले होते.” यावेळी त्याने बँक स्टेटमेंट देखील दाखवले. एवढ्यावरच न थांबता कासले म्हणाला, “ईव्हीएममध्ये छेडछाड होणार होती, आणि मी गप्प बसावं म्हणून पैसे देण्यात आले.”
एन्काऊंटर ऑफरचा दावा – बंद दाराआड चर्चा!
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर कासलेने वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य करत सांगितले, “अशा गोष्टी उघडपणे सांगितल्या जात नाहीत, या गोष्टी बंद दाराआड ठरवल्या जातात.” त्यामुळे हा कथित बनावट एन्काऊंटर एका मोठ्या साखळीचा भाग होता का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत आर्थिक व्यवहार?
कासलेने खुलासा करत सांगितले की, “संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनी (मालक वाल्मिक कराड) येथून त्याच्या खात्यावर १० लाख रुपये आले होते. यातील साडे सात लाख रुपये परत केले असून उर्वरित रक्कम खर्चासाठी वापरली.” या व्यवहारामागे काही अंतर्गत करार तर नव्हता ना? याचाही तपास आता गरजेचा वाटतोय.
गुजरातमध्ये खंडणीप्रकरणात निलंबन
बीड पोलीस दलात असताना कासलेवर गुजरातमध्ये खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्याने सोशल मीडियावर सतत व्हिडीओ अपलोड करत आपली बाजू मांडली होती. “मी लवकरच शरण येणार” असा इशारा दिल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
धनंजय मुंडे आणि राजकारणाचे पुढचे काय?
कासलेने घेतलेले धनंजय मुंडे यांचे नाव आणि आरोप अत्यंत गंभीर असून, हे सर्व प्रकरण निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता या आरोपांची सखोल चौकशी होणार का?, धनंजय मुंडे यांची बाजू काय आहे?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकीय वर्तुळात भूकंप – सरकारची कसोटी
या प्रकरणामुळे राज्यात पोलीस यंत्रणा, राजकीय हस्तक्षेप आणि निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रणजित कासलेने केलेले दावे जर खरं ठरले, तर यामागे किती जणांचा हात आहे, हे उघड व्हायला हवे.