उन्हाच्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि अमरावतीच्या मेलघाट जंगलात भीषण आगीची प्रकरणं समोर आली आहेत. या आगींमुळे जीवितहानी, पर्यावरणीय नुकसान आणि आरोग्य धोक्यात आल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईच्या अंधेरीत भीषण आग; महिलेसह ६ जण जखमी
मुंबईच्या अंधेरी उपनगरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळील ‘ब्रोक लँड’ इमारतीत शुक्रवारी रात्री सुमारे २.४० वाजता एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. या आगीत ३४ वर्षीय अभिना संजनवाला या महिलेचा मृत्यू झाला असून, तिच्या दोन लहान मुलांसह एकूण ६ जण जखमी झाले आहेत. एक १० दिवसांचा अर्भक आणि ३ वर्षांचा बालकही जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका मुलाला गहन चिकित्सा विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे.
आग मुख्यतः विजेच्या तारा, फर्निचर आणि घरगुती वस्तूंमध्ये पसरली होती. मुंबई महापालिकेच्या चार अग्निशमन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या प्लायवुड फॅक्टरीत भीषण आग
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील मणि सूरत कॉम्प्लेक्समधील एका चार मजली प्लायवुड फॅक्टरीत शनिवारी पहाटे ४.३० वाजता मोठी आग लागली. भिवंडी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ चार गाड्या घटनास्थळी पाठवल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यासाठी अद्याप शेजारील महापालिकांची मदत मागवण्यात आलेली नाही.
अमरावती जिल्ह्यातील मेलघाट जंगलात लागली भीषण आग
अमरावती जिल्ह्यातील मेलघाटातील ढकना जंगलात भीषण आग लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा जळून खाक झाली आहे. स्थानिक आदिवासी मंडळी आणि वनविभागाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अत्यधिक उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग काही दिवसांपासून सुरू असून, त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेवरही धोका निर्माण झाला आहे.
नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील आग अद्याप कायम
नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये गेल्या शनिवारी लागलेली आग अद्यापही पूर्णतः विझवलेली नाही. आग वरून दिसत नसली तरी आतून कचऱ्याचा ढीग अजूनही धगधगत आहे, आणि सतत धूर निघत आहे. या कचराडोंगरातून निघणाऱ्या विषारी वायूंमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. ही आग पूर्णतः आटोक्यात आणण्यासाठी आणखी १० ते १२ दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरक्षा उपाययोजना अत्यावश्यक
राज्यभरात वाढत्या आगीच्या घटनांमुळे प्रशासनाला अधिक सजग राहण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा सुदृढ करणे, विजेच्या जुळणीची नियमित तपासणी करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे ही तातडीची गरज आहे. वाढत्या तापमानामुळे भविष्यातही आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.