Home Breaking News अरिजित सिंगच्या कार्यक्रमामुळे देहूरोडमध्ये वाहतूक ठप्प : वाहनांच्या लांबच लांब रांगा, चालकांना...

अरिजित सिंगच्या कार्यक्रमामुळे देहूरोडमध्ये वाहतूक ठप्प : वाहनांच्या लांबच लांब रांगा, चालकांना मनस्ताप

88
0

पुणे, १७ मार्च २०२५ : प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमामुळे देहूरोड परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. रविवारी या कार्यक्रमासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावल्याने परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

गहुंजे स्टेडियमकडे जाणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने देहूरोड परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनचालकांना तब्बल १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ जागेवर थांबावे लागत आहे. तसेच, काही ठिकाणी तीन ते चार वेळा सिग्नल लागण्याची वेळ आली आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वाहतूक बदलाचे पोलिसांचे नियोजन

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गांवर वाहतुकीत बदल केला आहे. रविवारी दुपारी १ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत या बदलांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

  • व्हीव्हीआयपी, व्हीआयपी आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी द्रुतगती मार्गाच्या उजव्या बाजूने वाहने सोडली जात आहेत.

  • मुंबईहून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी देहूरोड एक्झिटवरून डावीकडे वळून मामुर्डी गाव, मुकाई चौक, सिम्बायोसिस महाविद्यालय मार्गे, शितलादेवी मंदिर, लेखा फार्म मार्गे वाहने सोडली जात आहेत.

  • पुण्याहून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी किवळे ब्रिज मार्गे द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  • निगडी हँगिंग ब्रिजकडून येणाऱ्या वाहनांसाठी कृष्णा चौक मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची कोंडी

या नियोजनानंतरही देहूरोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे. काही वाहनधारक तब्बल अर्धा तासापर्यंत ठिकठिकाणी अडकून पडले. नागरिकांना वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

वाहनचालकांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना आयोजकांनी वाहनतळ व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्याची तक्रार केली आहे. स्थानिक रहिवाशांनी देखील अशा मोठ्या कार्यक्रमांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.