बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोन आरोपींना अखेर पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. दोघांना पुढील चौकशीसाठी सीआयडीच्या ताब्यात दिले जाणार आहे. या अटकेनंतर राज्यात चर्चेला उधाण आले आहे.
सुरेश धस यांची ठाम भूमिका
भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्य आरोपी अजून सापडलेला नाही, तो म्हणजे कृष्णा आंधळे आहे,” असे धस म्हणाले. तसेच, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना फक्त प्यादे म्हणून कामगिरी सोपवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ज्यांनी आदेश दिला, तोच खरा सूत्रधार आहे. आकाच्या आकांनी फोनाफोनी केली असेल, तर लवकरच त्यांचाही पर्दाफाश होईल,” अशी रोखठोक भूमिका धस यांनी मांडली.
एसआयटी स्थापन, तपासाला वेग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली होती. पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत आहे. या पथकात बीड गुन्हे अन्वेषण शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, आणि केज पोलिस ठाण्यातील अनुभवी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतंय
देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या निर्घृण हत्येमुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात आले, तर नागपूर अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. “अटक केलेले आरोपी खरे सूत्रधार नाहीत, त्यामुळे पोलीसांनी मुख्य आरोपीचा शोध घ्यावा,” अशी नागरिकांची मागणी आहे.
एसआयटीकडून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा शोध लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच, हत्येचे कारण आणि त्यामागील आर्थिक व राजकीय संबंध उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच या प्रकरणातील सर्व धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.