बारामती: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीकरांना केले विशेष आवाहन; ‘ज्येष्ठांचे काम पाहून तरुण नेतृत्वाला दिला पाठिंबा’.
बारामती: विधानसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीमधील प्रचार सभेत जनतेशी संवाद साधला आणि युगेंद्र पवार यांना मतदारांनी संधी द्यावी, असे स्पष्ट आवाहन केले. पवार यांनी अजित पवारांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत, बारामतीकरांना भविष्यातील मजबूत नेतृत्व उभा करण्यासाठी युगेंद्र पवारांचा पाठिंबा मागितला.
यावेळी शरद पवार म्हणाले, “तुम्ही मला चार वेळा मुख्यमंत्री केलं. अजितदादांच्या हातात बारामतीची सत्ता दिली. 25-30 वर्षे ते काम करत आले आहेत, आणि त्यांच्या कार्याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आता बारामतीला पुढे घेऊन जाण्यासाठी एका नव्या नेतृत्वाची गरज आहे. युगेंद्र पवारांसारखा जिद्दी आणि जाणकार उमेदवार या भूमीला आवश्यक आहे.”
पवार पुढे म्हणाले, “बारामतीचा लौकिक देशभर पोहोचला आहे. सुप्रिया सुळे संसदेत कामगिरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत, आणि बारामतीच्या विकासाचे श्रेय तुम्हा जनतेला आहे. आज एमआयडीसीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतोय. बारामतीच्या विकासात भाग घेणारा आणि समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास असलेला प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे.”
“राजकारण फक्त सत्ता नाही, लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आहे” – शरद पवार
1965 साली समाजकारणाची सुरुवात करताना शरद पवारांनी बारामतीत जलसंधारणासाठी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण केले. त्यांनी पुढे सांगितले, “त्या काळी गावागावात पाण्याची समस्या होती. तलाव आणि बंधारे बांधून पाण्याची व्यवस्था सुधारली. आज दूध उत्पादनातही वाढ झाली आहे. कृषी संकटात असताना शेतीला जोडधंदा देण्याचा विचार केला. हेच राजकारण आहे, लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचं.”
शिक्षण, उद्योग, आणि रोजगाराच्या संधींवर भर देत, त्यांनी बारामतीच्या चेहऱ्याला कसे बदलले याचा उल्लेख केला. “विद्या प्रतिष्ठानमुळे हजारो मुले शिक्षण घेत आहेत. बारामतीच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे. हा बदल जनतेच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाला,” असे पवार म्हणाले.
शेवटी पवार यांनी बारामतीकरांना घराघरात जाऊन युगेंद्र पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.