Home Breaking News माहिममध्ये तिघांचे तगडे आव्हान! सदा सरवणकर, अमित ठाकरे, महेश सावंत यांच्या संघर्षामुळे...

माहिममध्ये तिघांचे तगडे आव्हान! सदा सरवणकर, अमित ठाकरे, महेश सावंत यांच्या संघर्षामुळे माहिम विधानसभा होणार ‘हॉट सीट’

86
0

माहिम विधानसभा मतदारसंघ, ज्याला शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते, यंदाच्या निवडणुकीत चुरशीची ठरलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दुसरीकडे, महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे, तर महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या तिघांमधील स्पर्धा अत्यंत तगडी आणि उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तिढ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्यासाठी अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. सरवणकरांना विधानपरिषदेच्या जागेची ऑफर देत, त्यांच्या मुलीलाही परिषदेत स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या ऑफरला मान्य करून सरवणकरांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, असा शिंदे यांचा उद्देश असल्याचे सूत्रांकडून समजते. या संदर्भात काल रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. मात्र, सरवणकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, माझ्या मतदारांनी मला विधानसभेत निवडून पाठवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, त्यामुळे मी माझी उमेदवारी कायम ठेवणारच आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या अल्टिमेटममुळे माहिम विधानसभा मतदारसंघातील राजकीय तापमान वाढले आहे. या जागेवर सरवणकर, ठाकरे, आणि सावंत या तिघांमधील तिरंगी संघर्ष होणार असल्याची स्पष्टता निर्माण झाली आहे. अमित ठाकरे यांची उमेदवारी मनसेसाठी नवीन उर्जा देणारी ठरणार असल्याने युवा मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण आहे. महाविकास आघाडीच्या महेश सावंत यांची उमेदवारी ठाकरे गटाला बळकटी देणार असून, महिमातील पारंपरिक शिवसेना मतदार या गटाला मोठा प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.

सरवणकरांसाठी हे निवडणूक तिकीट कायम राखणे प्रतिष्ठेचा विषय झाला आहे, तर मुख्यमंत्री शिंदेंना महायुतीच्या एकत्रित यशासाठी हा अल्टिमेटम देण्याची गरज भासली आहे. 4 तारखेपर्यंत सरवणकरांनी उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, यामुळे निवडणुकीपूर्वीच्या परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.