मुंबई : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची भीषण घटना घडली असून यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येतेय. इतर जखमींना घाटकोपरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगण्यात येतंय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामद्ये ७ वर्षांच्या आणि १० वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पहाटे साडे चारच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेत जखमी झालेल्यांना घाटकोपरमधील राजवाडी रुग्णालयात दाखल केलंय.
आग लागली तेव्हा घरात सर्वजण झोपले होते. आग इतकी वेगात भडकली की घरातल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही. आगीच्या दुर्घटनेत ५ जण होरपळून मृत्यूमुखी पडले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केलं पण आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. जखमी अवस्थेत कुटुंबातील लोकांना बाहेर काढलं पण रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे मंजू प्रेम गुप्ता (३० वर्षे), अनिता गुप्ता (३९ वर्षे), प्रेम गुप्ता (३० वर्षे), परीस गुप्ता (७ वर्षे), नरेंद्र गुप्ता (१० वर्षे) अशी आहेत.
