Home महाराष्ट्र “२०१९ ला मातोश्रीवर नाक रगडायला अमित शाह..”, ‘नकली शिवसेने’च्या टीकेवर संजय राऊत...

“२०१९ ला मातोश्रीवर नाक रगडायला अमित शाह..”, ‘नकली शिवसेने’च्या टीकेवर संजय राऊत यांचं जोरदार प्रत्युत्तर

133
0

संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नांदेडच्या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे असं म्हटलं, तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी नकली आहे आणि काँग्रेस अर्धीच उरली आहे अशी टीका केली होती. या टीकेला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अमित शाह काय म्हणाले होते?

आमच्यासमोर जे निवडणूक लढत आहेत ते राहुल गांधींच्या नेतृत्वात लढत आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष आमच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी. गुजरातमध्ये म्हण आहे तीन तिघाडा काम बिघाडा. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अर्धा राहिला, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अर्धा झाला. या दोघांनी काँग्रेसलाही अर्धे करुन टाकलं. हे अर्धवट पक्ष महाराष्ट्राचं भलं करु शकतात? तर नाही. ही अशी ऑटोरिक्षा आहेत जिला तीन चाकं तर आहेत पण गिअर बॉक्स फियाटचा आहे, इतर इंजिन मर्सिडीजची आहे. या रिक्षेची काही दिशाच नाही. निवडणूक झाली की मतभेदांनीच ही आघाडी फुटून जाईल. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात आम्ही सगळे लढतो आहोत.

संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?

अमित शाह यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नकली म्हणाले होते. पण मी सांगू इच्छितो की असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही. तुमच्या हातात पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरुन पक्ष खरा की खोटा ठरवणार असाल तर जनता ते सहन करणार नाही. याच नकली शिवसेनेचे प्रमुख तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे त्यांच्यासमोर नाक रगडायला तुम्ही मातोश्रीवर अनेकदा आला आहात. २०१९ ला मातोश्रीवर आलात तेव्हा हीच शिवसेना असली होती. आता खोटे गोटे गळ्यात अडकवून फिरत आहात, त्यांना असली म्हणत आहात. मात्र आता हे गोटेच तुमचा कपाळमोक्ष करतील. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हेच दोन खरे पक्ष आहेत. बाकी अमित शाह यांनी जे डुप्लिकेट पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांन दिले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही.

पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही

आम्ही पालघरमध्ये भारती कामडींचा प्रचार सुरु केला आहे. महायुतीचं काही खरं दिसत नाही. त्यांना पालघरमध्ये उमेदवार सापडला नाही. तसंच कल्याणमध्ये संभ्रम आहे. ठाण्यात यांना उमेदवार सापडलेला नाही. मला वाटतं यांचे सगळे उमेदवार दिल्लीहून जाहीर होणार आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here